माझ्या कविता

15 Sep

बंदिस्त तलाव 

पावसाच्या सरीने,

दाहकता शांत होते.

उध्वस्त नदीच्या पात्राला,

संथ गती मिळते.

उष्ण वा-याला स्पर्शता,

थंड लहरी प्रसवते.

बंदिस्त तलावाचे,

दुरूनी दर्शन होते.

व्याकुळलेल्या जिवाला,

जीवन असह्य होते.

परी शितल झुळकीने,

मन सुखावूनी जाते.

आर.के.जुमळे 

परिवर्तन तुझ्या पुढ्यात आहे…

चातुर्वर्ण्याच्या आगीत तु जळत होतास,

जातियतेच्या दलदलीत तु फसला होतास,

दैव-अंधश्रद्धेच्या चिखलात तु रुतला होतास,

पण फुले-शाहू-आंबेडकरांनी पेटवली मशाल !

त्या दिव्य प्रकाशाने न्हाऊन निघालास,

शिकला-सवरला नोकरी धंद्याला लागलास,

चळवळीचा तु पुर्ण फायदा घेतलास,

फुले-शाहू-आंबेडकर चळवळीचा वारस तु !

त्यांच्या संपत्तीचा वाटा घेतलास,

त्यांच्या त्यागाने  उत्तरोत्तर सुधारलास,

परंतु चळवळीला मात्र विसरलास,

तरीही काही जणांनी हा संगर पेटतच ठेवला.

घे त्यात उडी सर्वस्वी झोकुनी,

बहुजन समाजाला संघटीत करूनी,

वेळ-पैसा-बुद्धिची आहुती देऊनी,

मित्रा सामाजिक परिवर्तन-आर्थिक मुक्ती दुर नाही, 

त्याची गरज तुलाच आहे,

इच्छेची त्याला जोडही आहे, 

शक्तीची मात्र उणीव आहे.

भरूनी काढ ही उणीव, 

परिवर्तन पुढ्यात आहे, 

परिवर्तन तुझ्या पुढ्यात आहे…

आर.के.जुमळे,

अकोला 

Leave a comment