बोनगाव-कोलकाताची सफर (सुधारीत)
31 Decमी माझ्या पत्नीसह या वर्षीच्या जानेवारी महिन्यात बोनगाव या गावला गेलो होतो. खरं म्हणजे या गावाचे नाव बनगाव आहे. पण बंगाली भाषेत शब्दांचे उच्चार ओकारयुक्त असल्याने बंगाली लोक बनगावला बोनगाव म्हणतात. या ठीकाणी आम्ही मुलाकडे राहिलो होतो.
तेथे माझा मोठा मुलगा कस्टममध्ये असिस्टंट कमिशनर होता. त्याची आय.आर.एस. साठी निवड झाल्यावर पहिल्यांदा त्याला या भागात नेमणूक मिळाली.
हे गाव तालुक्याचं ठिकाण असून पश्चिम बंगालच्या २४ नोर्थ परगणा या जिल्ह्यात आहे. २४ नोर्थ परगणा नावाचं कोणतही शहर नाही, तर बारासात हे शहर या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
बोनगाव हे तालुक्याचं ठिकाण असून कोलकातापासून बांगलादेशच्या जेस्सोर रोडवर, १२५ किलोमिटर दूर आहे. येथे जवळच पेट्रापोल हे ठिकाण बांगलादेश व भारत या सिमेवर आहे. तेथून जवळपास रोज ४०० ट्र्कच्या मालाची आयात-निर्यात होत असते.
यापूर्वी मी १९८६ सालात कुटुंबासह माझ्या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यलयाकडून मिळणार्या रजाप्रवास सवलत अंतर्गत काठमांडू पर्यंत प्रवास केला होता. त्यावेळी मुलं लहान होते. तेथून आम्ही दार्जिलींगला जातांना कोलकाताला एक दिवस थांबलो होतो. या शहरात त्यावेळी अनुभवणारी गर्दी आताही तेवढीच होती. त्यावेळी आमची ट्रॅव्हलबस ट्रॅफिकमध्ये अडकली होती. त्यामुळे गर्दीची आठवण आहे.
त्यावेळच्या कलकत्त्याचं आता कोलकाता असे नाव झाले. तथापी त्यावेळी रिक्ष्यात बसलेल्या प्रवाशांना माणसं ओढत. आता मात्र ते चित्र दिसले नाही. त्यावेळी रोडवर ट्राम धावत असत. आताही एकट-दुकट ट्राम जातांना दिसत होत्या.
गेल्या २५ वर्षापासून या राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सतत सत्ता होती. आता मात्र सत्तेत परिवर्तन होऊन ममता बॅनर्जी मुख्यमंत्री असलेल्या तृणमूल कॉंग्रेसची सत्ता आली आहे.
मार्क्सवादी म्हणतात की, धर्म ही अफूची गोळी आहे. तरीही या राज्यात कमालीचे देव-धर्माचे प्रस्थ नांदत आहे. त्यात तसूभरही बदल झाल्याचं मला आढळले नाही. कारण कुठेही पुरोगामी विचार पेरल्याचे दिसले नाही. साम्यवादी विचारसरणी येथे कुठेही रुजलेली दिसली नाही. कारण काही किलोमिटर अंतरावर ‘हरे रामा हरे कृष्णा, मिशनचे देशातील मुख्य ठिकाण मायापुरीला आहे. तसेच पूर्वापार चालत आलेल्या अंधश्रध्दा काही कमी झाल्याचं दिसलं नाही. त्यांच्या राजवटीत लोकांची गरीबी सुध्दा हटलेली दिसून आलेली नाही. आताही तेथे कमालीची दैनावस्था थैमान घालत असल्याचे दिसते.
येथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे येथील विवाहीत महिला गुलामीचं प्रतीक असलेल्या काळ्या मण्यांच्या गाठ्या किंवा मंगळसुत्र न घालता त्याएवजी दोन्ही हातात पांढर्या व लाल रंगाचे असे दोन कडे घालतात. येथील मुस्लीम महिला पण बुरखे घालतांना दिसल्या नाहीत.
सत्तांतरामुळे पक्ष म्हणजे बाटली बदलली, पण दारु मात्र बदलेली दिसली नाही. त्यामुळे लोकांच्या राहणीमानात फारसा फरक पडेल; असं वाटत नाही. शेतकर्यांच्या मालाला उचित भाव मिळत नसल्याने कर्जात बुडालेल्या शेतकर्यांनी विदर्भासारखे येथेही आत्महत्त्या करीत असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात वाचल्या आहेत.
बोनगावात सायकलरिक्षा व ऑटो क्वचित दिसतात. तेथे महाराष्टात सामान वाहून नेणारे ढकलगाडी जसे असतात, तसे माणसांना घेऊन जाणारे सायकल-ढकलगाडी सर्रास जिकडे-तिकडे मोठ्या प्रमाणात रोडवर दिसत होत्या.
आम्ही घरी गेल्यावर सुनेने विचारले, ’तुम्हाला व्हॅन दिसल्या.? मला वाटलं व्हॅन म्हणजे मारुतीव्हॅन असावेत. पण हे वेगळेच वाहन होते. इकडे सायकलने जोडलेल्या ढकलगाडीला व्हॅन असे म्हणतात; असे तिने सांगितल्यावर आम्हाला हसू आले.
ह्या. व्हॅनवर पुढे दोन व मागे दोन असे चार लोक खाली पाय सोडून निवांतपणे बसून जातात. पाऊस आला तर व्हॅनवरील प्रवाशांना जर छत्री नसेल तर ओले झाल्याशिवाय गत्यंतर राहात नाही. कारण त्यांच्या व्हॅनवर वर काही आवरण नाही आणि बसायची जागा पण ओली होऊ शकते. उन्हा-पावसाच्या सुरक्षेसाठी प्रवाशांनाच छत्र्या घेऊन बसावे लागते.
ह्या व्हॅनचे भाडे मात्र कमी आहे. इतर प्रवाशाच्या ’शेअर सिस्टीम’मुळे भाडे केवळ पाच रुपये व त्यापेक्षा दूर असेल तर त्यापेक्षा थोडं जास्त होतं. पण किमान भाडे फक्त पाच रुपये. येथे रुपयाला टका म्हणतात. यांच्या संघटनेने दुसर्या वाहनांना येऊ दिले नाही, असे समजले. रेल्वे आली की, आमच्या घरासमोरुन रोडने हे व्हॅन भरभरून जायचे. हे व्हॅनवाले आणि इतर सर्वसामान्य लोक सर्रास उघडपणे कुठेही बिड्या ओढतांना दिसतात. त्यामुळे वायूचं प्रदुषन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या धुम्रपानाचा मला फार त्रास होत होता.
येथील लोक सायकलीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत असल्याचे दिसते. त्यामुळे पेट्रोलवर धावणाऱ्या दुचाकी वाहनाने होणारे प्रदुर्षण टाळण्यास मदत होते, ही गोष्ट काही कमी महत्वाची नाही.
तेथील स्थानिक लोकांना हिंदी समजत नाही, असं नाही. काही हिंदी बोलत पण होते. पण बर्याच लोकांना समजतही नव्हतं व बोलताही येत नव्हतं; अशीही परिस्थिती होती. पण बंगाली भाषा जरी आपल्याला समजत नसली तरी ऐकायला मात्र फार गोड वाटते. कदाचित बंगाली लोक रसगुल्ला, चमचम सारखे गोड पदार्थ मोठ्या चवीने खात असल्याने त्यांच्या भाषेत गोडवा तर निर्माण झाला नसावा ! आम्हाला शेजारच्या एका बंगाली कुटुंबांनी जेवायला बोलाविले होते. त्यांनी जेवायच्या आधी आम्हाला बंगाली मिठाई खायला दिली. जेवणात त्यांनी मांसाहारात मच्छीफ्राय. चिकनकरी त्याशिवाय दोन प्रकारच्या शाकाहारी भाज्या, मसुरची डाळ, भात व पोळ्या असा मेनू होता. तेथील लोक जेवणात तर भात खातातच त्याशिवाय सकाळच्या नास्त्यात सुध्दा भात खातात. जेवणात कधी पोळ्या खात नाही. येथे स्वयंपाकात फोडणीला सरसोच म्हणजे मोहरीचं तेल वापरतात.
एखाद्यं सामान विकत घ्यायला गेलो की, त्याला काय म्हणायचं ते कळत नव्हतं. मग ती वस्तू जर दिसण्यासारखी असली, की त्याला हाताचा स्पर्ष करुन सांगावे लागत होते. माझ्या सुनेला किराणा घ्यायचा असला की, दुकानातील वस्तूला हात लाऊन सांगत होती. अशी भाषेची अडचण येत होती.
कपडा खरेदी करतांना एक गोष्ट जाणवली ती म्हणजे सारे कपडे न दाखविता एक कपडा दाखविला व पसंद पडला नाही तर त्याची घडी करून ठेवल्यानंतरच दुसरा कपडा दाखवीत. महाराष्ट्रात मात्र बऱ्याच ठिकाणी कपडा पसंद पडेपर्यंत दाखविलेल्या कपड्याचा ढीग पडत असतो.
येथे मच्छीचा मोठा बाजार भरतो. आम्हा खवय्यांची जणू पर्वणीच. गावाजवळ समुद्र नाही, पण गोडे पाण्याचे छोटे छोटे तलाव म्हणजे पॉंड्स आहेत. त्यात मासे पाळतात व मोठ्या झाल्यावर विकतात. रहू, कथला ह्या महाराष्ट्रातील मासे तिकडे पण मिळतात. तेथील बेटकी मासा खायला चवदार वाटला, पण महाग आहे. ३०० रुपये किलो. बांगलादेशाचा इलीस मासा ज्याला पश्चिमबंगाल मध्ये हिंल्सा म्हणतात – क्वचित येतो. त्याची किंमत जवळपास १००० रुपये किलोपर्यत तरी असते. इतका तो महाग आहे. त्याला बोनगावच्या मच्छीबाजारात घेण्यासाठी सकाळपासून रांगेत उभे राहावे लागते, असं म्हणतात. तो बांगलादेशाचा राष्ट्रीय मासा म्हणून ओळखल्या जातो.
एकदा बांगलादेशाचा राष्ट्रीय मासा कोणता असा प्रश्न ‘कौन बनेगा करोडपती’ या टी.व्ही. कार्यक्रमात विचारला होता. या माशाला बारीक काटे असतात. पण खायला तुपाच्या चविसारखा अत्यंत रुचकर आणि वेगळाच लागतो. आम्ही खाऊन त्याची प्रत्यक्ष चव घेतली तेव्हा खरोखरच तृप्त झालो.. येथे मोठे झिंगे म्हणजे प्रॉन्स मिळतात. त्याच्या किंमती ४०० रुपयापासून ६०० रुपये किलोपर्यंत आहेत.
येथे भारत-बांगलादेशाची सीमारेषा आहे. दोन्ही देशाच्या सीमारेषेत ‘झिरो पॉईंट’ किवा ’नो मॅन लॅंड’ अशी रिकामी जागा आहे. म्हणजे या जागेवर कोणत्याच देशाची मालकी नाही. आहे की नाही गम्मत ! आम्ही या जागेवर जाऊन थांबलो तेव्हा मनात वेगळीच भावना दाटून आली होती.
सिमारेषेवर कुठेकुठे काटेरी कुंपण केले आहे. पण काही गाव असे आहेत की ते भारतात आहेत की बांगलादेशात आहेत याचा निर्णय अजूनही झालेला नाही. काही घरे भारतात तर त्या घराचे आंगण बांगलादेशात आहेत, अशीही गंमत पाहायला मिळाली. येथूनच स्मगलींगचा व्यवहार होण्यास मोठा वाव आहे, असे कळले. बागलादेशात गाई-बैलाचं मास मोठ्या प्रमाणात खात असल्याने या जनावरांची तेथे फार मागणी आहे. म्हणूनच दुरदुरच्या राज्यातून आणलेली गुरे-ढोरे अशा गावातून किवा नदीतून लपून-छपून बांगलादेशात नेले जात असल्याचे ऐकले. पूर्वी अशा स्मगलींग करणार्यांना बॉर्डर सिक्युरीटी फोर्सच्या सैनिकांना फायरिंग करता येत होते. पण आता त्यांच्याकडील असे अधिकार काढून घेतल्याचे समजले. त्यामुळे स्मगलर्सवरील वचक कमी झाल्याने तेच या सैनिकांवर हल्ला करुन बांगलादेशात पळून जात असल्याच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या.
तेथील सभेची एक आगळी-वेगळी पध्दत मला दिसली. कुठेतरी लोकांच्या भरगर्दीच्या चौकात एखादा स्टेज असतो. तेथे दोन-चार लोक खुर्च्या टाकून बसलेले असतात. एखादा वक्ता माईकवर बोलत असतात. त्यांच भाषण ऎकणारे तेथे कुणीच श्रोते बसलेले अथवा उभे असलेले दिसत नाहीत, तर तेथून भोवताल रोडच्या बाजूला दूर-दूर पर्यंत लॉउडस्पिकरचे भोंगे लावतात. त्या भोंग्याच्या माध्यमातून जाणारे-येणारे चालता चालता किंवा दुकानात बसलेले व्यापारी आपला धंदा करता करता किंवा गिर्हाईक सामान विकत घेता घेता, त्याचे भाषण ऎकत असतात. आहे की नाही गंमत! त्यामुळे कुणाचेही व्यवहार थांबत नाहीत किंवा कुणाला काही अडथळा निर्माण होत नाही.. ही पध्दत मला खरोखरच चांगली वाटली.
आणखी एक गोष्ट मला पाहायला मिळाली; ती म्हणजे कोणत्याही मिरवणूक किंवा मोर्चासोबत एकही पोलीस दिसला नाही. आपल्या महाराष्टात तर अशा वेळेस लोकांपेक्षा पोलीसच जास्त दिसतात.
कम्युनिस्ट पार्टीची एक मिरवणूक – मिरवणूक होती की मोर्चा होता, काय माहिती ? आमच्या घरासमोरून विळा-हातोडीचे चिन्ह असलेले लाल झेंडे घेऊन, घोषणा देत देत चालले होते. पण मला त्यांच्या मागे-पुढे एकही पोलीस दिसला नाही. निदान राजकीय पक्षाच्या मिरवणूकां-मोर्चासोबत तरी पोलीस आमच्याकडे जसे असतात, तसे पाहिजे होते ना ? पण नाही ! त्यामुळे मला गंमतही वाटत होती आणि पोलिसांना विणाकारण त्रास नाही, म्हणून चांगली गोष्ट असल्याचेही जाणवले होते !
येथे महाराष्ट्रासारखे वाहनधारकांकडून पैसे उकळण्यासाठी टपून बसलेले ट्रॅफिक पोलीस मात्र दिसले नाहीत. तर त्याऎवजी कोणताही गणवेष न घातलेले, पण कोणत्याही पोशाखावर पिवळा रंगाचा जाकीट घातलेले व हातात जाड आकाराचा अर्धा-दांडूका घेतलेले कंत्राटदाराचे कर्मचारी असल्याचे दिसले. येथेही मला सरकारची काटकसरच दिसली.
असं सांगतात की, कम्युनिस्ट राजवटीत प्रशासनामध्ये एक प्रकारची वेगळी संस्कृती निर्माण झाली होती ! कर्मचारी फारसे काम करीत नसत. वेळेवर कधी येत नसत. कामगार युनियनच्या जबरदस्त दहशतीमुळे कोणताही अधिकारी कारवाई करण्याची हिंमत करीत नव्हते. नाहीतर संप आणि आंदोलन याला सामोरे जावे लागे. आता सत्ता बदलली तरीही तृणमूल कॉंग्रेसच्या राजवटीत फारशी सुधारणा झालेली नाही, अशी माहिती मिळाली.
एक दिवस अशीच हातात बंगला भाषेत लिहिलेले व ज्ञानेश्वर महाराज पालखट मांडून बसतात; तसे चित्र असलेले बॅनर घेऊन ढोल-ताशाच्या तालावर नाचत नाचत भल्या मोठ्या मिरवणूका राहून राहून आमच्या घरासमोरच्या रोडवरुन जात होत्या.
मी माहिती घेतल्यावर कळले की, त्या दिवशी हरीचंद ठाकूरची जयंती होती. मला हरीचंद व गुरुचंद या दोन ठाकूर बंधूनी केलेल्या चळवळीबद्द्ल माहिती होती. त्यांनी बंगालमधील अस्पृष्य जातीतील चांडाल लोकांची, नमो-शुद्रायची चळवळ चालविली होती.
बारासातच्या बहुजन समाज पार्टीच्या एका कार्यकर्त्यांनी एक आठवण सांगितली. माननीय कांशीरामजींनी बोनगाव येथे एकदा सभेसाठी आले होते, तेव्हा ज्या लोकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना घटना समितीवर निवडून आणले होते, त्या लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन येथील माती त्यांनी कपाळाला लावली होती. असा तो कार्यकर्ता सांगत होता.
जेस्सोर-खुलना या भागात या लोकांचा जास्त भरणा आहे. म्हणूनच जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घटना परिषदेत अस्पृष्यांच्या घटनात्मक सुरक्षेसाठी जाणे आवश्यक वाटले, तेव्हा कॉंग्रेसने सारे दरवाजे बंद केले होते. त्यांना कुठूनही निवडून येणे अशक्य केले होते. सरदार पटेल यांनी जाहीर केले होते की, ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांना घटना परिषदेचे दरवाजेच काय, खिडक्यासुध्दा आम्ही बंद केले आहे.’ म्हणून त्यावेळी बंगालमधील नमो-शुद्राय चळवळीचे नेते व बाबासाहेबांचे अनुयायी जोगेंद्रनाथ मंडळ यांनी मुसलमानाच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तेथून निवडून पाठविले होते. हा इतिहास त्यावेळी मला आठवला होता. पण या इतिहासाच्या खाणाखुणा मला येथे दिसल्या नाहीत.
अशा विसरलेल्या इतिहासाचा संदर्भ घेत बोनगाव-कोलकाताची सफर संपवून आम्ही अकोल्याला परत आलो.
मानवाच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे विपश्यना
31 Decभगवान बुध्द हे महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही विपश्यना विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. विपश्यना भगवान बुध्दाच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत ध्यानावरच विशेष भर दिला आहे.
विपश्यना ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी असून अद्वितीय आहे. ती एक निखळ सुख आणि मन:शांती मिळवून देणारी तर्कसंगत अशी साधना आहे.
या साधनेच्या अभ्यासाने स्वत:च्या शरीर व मनात खोलवर दडलेल्या समस्यांची उकल होऊन, त्या दूर होण्यास मदत होते. आपल्यामधील सुप्त शक्तीचा विकास होतो. त्या शक्तीचा उपयोग स्वत:च्या व इतरांच्या कल्याणासाठी करता येतो. या साधनेद्वारे केवळ शारीरिक वेदना दूर होतात, असे नाही तर जीवनात मोठा क्रांतीकारी मानसिक बदल सुध्दा घडवून येतात.
ही कल्याणकारी विद्या भारतातून जगात पसरली. गुरु-शिष्य परंपरेच्या माध्यमातून ही विद्या ब्रम्हदेशात शुध्द स्वरूपात जतन करण्यात आली. सत्यनारायन गोयंकाजी यांनी ही विधी ब्रम्हदेशातून आणून नाशिक जवळील इगतपुरी येथे व देशातील इतर काही ठिकाणी दहा दिवसाच्या शिबिरातून प्रशिक्षित आचार्यांच्या माध्यमातून शिकवीत आहेत.
तसेच विपश्यना शिबीर त्रेलोक्य बौध्द महासंघ, सद् धम्म प्रचार समिती व इतरही काही धार्मिक संस्था आयोजित करीत असतात.
विपश्यनात दोन प्रकारचा अभ्यास आहे. पहिला अभ्यास आनापानसतीचा व दुसरा स्वत:च्या शरीरातील प्रत्येक पेशीत उमटणार्या संवेदनाचे निरीक्षण करणे.
आनापानसती विपश्यनाचा पाया आहे. ही एक प्राथमिक क्रिया आहे. म्हणून या शिबिरात सुरुवातीला ‘आनापानसती’ शिकवून मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास आणि सराव केल्या जाते. हा अभ्यास विपश्यना साधनेची पूर्वतयारीच असते. आन म्हणजे श्वास आत घेणे, अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे व सती म्हणजे येणार्या व जाणार्या श्वासावर लक्ष ठेवणे. म्हणजेच या अभ्यासात शरीरात नाकावाटे सहज आणि स्वाभविक येणारा तसेच बाहेर पडणारा श्वासावर लक्ष केंद्रित केल्या जाते. आपले मन जागृत ठेवले जाते.
विपश्यनाला पाली भाषेत विपस्सना म्हटले जाते. त्यात वि आणि पस्सना असे दोन शब्द आहेत. वि म्हणजे विशेष रुपाने आणि पस्सना म्हणजे जाणणे, पाहणे किवा अनुभूती घेणे. म्हणजेच जग जसे आहे तसे पाहणे. जगाची वास्तवता समजून घेणे. वस्तू जशा आहेत तसे पाहाणे व त्यांच्या अस्तित्वाचे सत्यदर्शन म्हणजे विपश्यना.
या विधीत आपल्या स्वत::च्या शरीरात उत्पन्न होणार्या सर्वसामान्य, नैसर्गिक संवेदनाचे पध्दतशीर व नि:पक्षपातीपणे निरीक्षण केल्या जाते. कारण संवेदनाच्या आधारेच आपल्याला प्रत्यक्ष सत्याची अनुभूती होते. विपश्यना करतांना शरीर आणि मनाचे संपूर्ण सत्य अनुभवाच्या पातळीवर समजून घेतल्या जाते. विपश्यनामुळे मनाच्या खोल गाभ्यात बदलांची प्रक्रिया सुरु होते.
कोणत्याही समस्येचे मूळ आपल्या मनात असल्याने तिच्याशी मानसिक स्तरावरच सामना केला पाहिजे. म्हणून विपश्यनेच्या माध्यमातून मनावर संस्कार करण्याचा अभ्यास विपश्यना शिबिरात शिकविले जातात. हा अभ्यास अत्यंत गांभिर्याने, नैसर्गिक वातावरणात आचार्याच्या मार्गदर्शनात भारतात आणि परदेशात वैज्ञानीक पद्धतीने शिकविल्या जाते.
मन हे सतत भरकटत असते. चवताळलेला हत्ती काहीही नुकसान करू शकतो, पण त्याला जर काबूत ठेवले तर तो चांगल्या कामात उपयोगी पडू शकतो. तसेच मनाचे आहे. मनाला काबूत ठेवण्यासाठी विपश्यना हे एक चांगले साधन आहे. आपले चित्त, मन एखाद्या गोष्टीवर अथवा कार्यावर एकाग्र करणे, त्या कार्याप्रती पूर्णपणे जागृत राहणे व ते कार्य सर्वशक्तीनिशी पार पाडणे हे आनापानसतीचा अभ्यास करणारे चांगल्या रीतीने करू शकतात.
श्वास म्हणजे जीवन आहे. श्वास बंद पडला की जीवन संपले. म्हणून आनापानसतीचा अभ्यास करतांना या गोष्टीची सतत आठवण होत असते. त्यामुळे आपले जीवन किती अनित्य आहे, क्षणभंगुर आहे. या गोष्टीची जाणीव होत असते. म्हणून या ध्यानात एकाग्रता, जागरूकता व स्मृती या तीनही गोष्टीचा लाभ होतो.
सत्याच्या अनुभूतीचा एकमेव मार्ग म्हणजे स्वत :च्या अंतर्मनाचे आपण स्वत:च केलेले निरीक्षण होय. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेला हा मार्ग आत्मनिरीक्षणाचा, स्वत:ला शास्त्रीय पद्धतीने तपासण्याचा मार्ग आहे. त्यामुळे आपल्या स्वत:च्या स्वभावाचे ज्ञान करून आपल्यामधील दोष, विकार नष्ट करता येते. अंतर्मनातील अंधकार दूर करता येते. निसर्गाचे अस्तित्व आणि त्याचे नियम समजून घेता येते. या अभ्यासाने दु:ख, प्रक्षुब्द व ताणतणाव निर्माण करणारे कारणे शोधून त्याला नष्ट करता येते. त्यामुळे आपले मन शुध्द, शांत व आनंदी होत जाते.
भगवान बुध्दांनी आपल्या मनाच्या तीक्ष्ण एकाग्रतेने आपल्या मनाच्या खोलीत शिरून सत्याचा तळ गाठला. त्यांना आढळले की, आपले शरीर अत्यंत लहान लहान परमानुचे बनले आहे. ते सतत उत्पन्न होवून नष्ट होत असते. म्हणजेच जीवनाच्या अनित्यतेची जाणीव होते. अनित्यतेची जाणीव झाल्याने मनुष्य कुशल कर्मे करण्याकडे वळतो. स्वतःतील दोष कमी करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार दूर करतो. उर्वरित आयुष्य दु:खात घालविण्यापेक्षा सुख आणि आनंदात घालवितो. असे अनेक फायदे या ध्यान साधनेने मनुष्याला प्राप्त होते.
शरीरातील प्रत्येक कण परिवर्तनीय व बदलत असल्याने ‘मी’ ‘माझा’ असे म्हणावे असे काहीच स्थिर राहात नाही. हे सत्य साधकाच्या लक्षात येते. त्यामुळे अनात्मतेचा बोध होतो. आणखी एक सत्य साधकाला स्पष्ट होते ते असे की, ‘मी’ व ‘माझे’ची आसक्ती हीच तर दु:ख निर्मिती करते. ह्या सार्या गोष्टी कोणी सांगितले म्हणून नव्हे तर आपल्या स्वत:च्या अनुभवावरून संवेदनाच्या निरीक्षणामुळे समजू लागतात.
या अभ्यासात शिकविले जाते की, शरीरात उमटणार्या संवेदनावर कोणतीही मग ती सुखद असो, दु:खद असो की, सुखद-दु:खद असो – प्रतिक्रिया व्यक्त न करता नि:ष्पक्ष राहून केवळ निरीक्षण केल्याने दुखा:च्या आहारी जात नाही. कारण संवेदना सतत बदलत असतात. त्या कायम राहत नाही. उदय होणे, व्यय होणे हा तिचा नैसर्गिक स्वभाव असल्याचे जाणवते. म्हणून सजगता व समतेत राहिल्याने आपण दुख:मुक्त होऊ शकतो, ही गोष्ट साधकाच्या लक्षात येते.
तसेच प्रत्येक संस्कार उत्पन्न होते, लय पावते. ते परत उत्पन्न होते, लय पावते. ही क्रिया सतत सुरु राहते. आपण प्रज्ञेचा विकास करून तटस्थपणे निरीक्षण केल्यास, संस्काराची पुनर्निर्मिती थांबते. आताच्या आणि पूर्वसंचित संस्काराचे उच्चाटन झाले की, आपण दुख:मुक्तीचा आनंद उपभोगू शकतो, हेही साधकाच्या लक्षात येते.
संवेदनापासून तृष्णेऐवजी प्रज्ञाच विकसित होते. प्रज्ञेमुळे दुखा:ची साखळी तुटते. राग व द्वेषाच्या नवीन प्रतिक्रिया निर्माण होत नाहीत. त्यामुळे दुख: निर्माण होण्याचे कारणच उरत नाही. मनाच्या दोलायमान स्थितीत घेतलेले निर्णय ही एक प्रतिक्रियाच असते. ती सकारात्मक कृती राहत नसून ती एक नकारात्मक कृती बनते. ज्यावेळी मन शांत व समतोल असते. तेव्हा घेतलेले निर्णय हे कधीही दुख:दायक नसते तर ते आनंददायकच असते. जेव्हा प्रतिकिया थांबतात, तेव्हा तणाव दूर होतात. त्यावेळी आपण जीवनातील खरा आनंद उपभोगू शकतो, याची साधकाला प्रचीती येते.
आपण सुखी व आनंदित झालो की, असेच सुख आणि आनंद दुसर्यालाही मिळावे म्हणून कामना करतो. सर्वांचे कल्याण होवो, सर्व दुख:मुक्त होवोत, हीच तर ‘विपश्यना ध्यान’ साधनेचा उद्देश आहे. यालाच ‘मेत्ता भावना’ म्हणजेच ‘मैत्री भावना’ म्हणतात.
भगवान बुद्धांनी या अभ्यासाद्वारे जाणले की, मनुष्याला होणारे दु:ख हे काही दैवी कारणाने होत नसते. तर त्याला जसे इतर कोणत्याही गोष्टी कारणाशिवाय घडत नाहीत, तसे दु:खाला सुध्दा कारणे आहेत.
भगवान बुद्धांनी अखिल मानवाला दु:खमुक्त होण्यासाठी चार आर्यसत्य व अष्टांगिक मार्गाची शिकवण दिली. चार आर्यसत्यामध्ये दु:ख. दु:खाची कारणे, दु:खाचा निरोध आणि दु:ख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग याचा समावेश आहे.
अष्टांगिक मार्गामध्ये १. सम्यक दृष्टी, २. सम्यक संकल्प, ३. सम्यक वाचा, ४. सम्यक कर्म, ५. सम्यक आजीविका, ६. सम्यक व्यायाम, ७. सम्यक स्मृती व ८. सम्यक समाधी याचा समावेश होतो. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी जसे शारीरिक व्यायाम करतो, तसेच मनाला निरोगी ठेवण्यासाठी मनाचा व्यायाम म्हणजे ही विपश्यना साधना होय.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, जो व्यक्ती शरीराने आणि मनाने निरोगी आहे, अशा व्यक्तीला सुदृढ आणि सक्षम म्हटल्या जाते. विपश्यना साधनेमध्ये मानवी मन हे केंद्रस्थानी आहे. शरीरावर होणार्या प्रतिक्रिया ह्या मनातून निर्माण होतात. म्हणून मन हे निरोगी असेल तरच शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
ही वैज्ञानीक साधना शिकण्यासाठी विविध भाषा, जाती, धर्म, सम्प्रदाय, लिंग असलेले लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. त्यामुळे जातीय सलोखा निर्माण होण्यात या विधीचा मोठा हातभार लागत आहे.
आज दहशतवाद व अण्वस्त्राच्या भीतीने जगात अशांतता व अस्वस्थता निर्माण होत आहे. तेव्हा जगात शांतता नांदण्यासाठी विपश्यना विधीची फार मोठी मदत होत आहे. जगात ठिकठिकाणी विपश्यना केद्रे स्थापन होत आहेत. त्यामुळे ह्या विधीचा सार्या जगात झपाट्याने प्रसार होत आहे.
भारतातील पहिल्या महिला आय.पी.एस. अधिकारी किरण बेदी यांनी कैद्यांसाठी विपश्यना अभ्यासाची व्यवस्था केली होती. त्यामुळे गुन्हेगारी जग सुधारण्यास या विधीचा उपयोग होत आहे.
शासन त्यांच्या अधिकार्यांना ही विद्या शिकता यावी म्हणून शिबिराला पाठविण्याची व्यवस्था करीत आहेत. प्रशासकीय कामे करतांना मानसिक तणाव दूर होतो. ही विधी शिकतांना भगवान बुद्धांनी सांगितलेला शील-समाधी-प्रज्ञा तसेच पंचशीलेची शिकवण मिळत असल्याने साधक वर्ग नीतीमान बनत असतो. त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव राहत नाही. वक्तशीरपणा, प्रामाणीकपणा हे गुण साधक वर्गात वाढीस लागत आहेत.
लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत आज शिबिरे आयोजीत होत आहेत. त्यामुळे मैत्री, करुणेचे भगवान बुध्दाचे तत्वज्ञान जनमानसात रुजत आहेत. सामाजिक सलोखा निर्माण होण्यास तसेच आजच्या अनैतिक जगात माणसाला सदाचारी, चारीत्रवान, निरोगी बनविण्यासाठी या विधीचा फार मोठा हातभार लागत आहे.
विपश्यनेचा व्यक्तिगत दृष्टीने नियमित अभ्यास केल्याने मनातील राग, द्वेष, मोह, तृष्णा, वासना, लोभ, भयं असे विकार नष्ट होतात. त्यामुळे दु:ख आणि विकारातून मुक्त होवून मानवाचे कल्याण होते. तसेच सामाजिक दृष्टीने विशुद्धी, पावित्र, सदाचार, नैतिकतेचा पाया मजबूत होवून समाजविकास घडून येतो.
आज जगासमोर उपासमार, गरिबी, जातीयवाद, हिंसाचार, दहशतवाद, हुकूमशाही, युध्दजन्य परिस्थिती असे जे भयावह स्थिती दिसत आहेत, त्याला शांत करण्यासाठी भगवान बुध्दाचे समता, स्वातंत्र, बंधुत्व व न्याय तसेच अहिंसा, प्रज्ञा, शील, करुणा व मैत्रीचे तत्वज्ञान व त्यांची विपश्यना विधी हेच उत्तर आहे. म्हणून विपश्यना साधना ही मानवी कल्याणाचा मार्ग आहे.
लुधियानाचा प्रवास
27 Novमाझा मुलगा – प्रज्ञाशील याची लुधियाना येथे बदली झाल्याने मी व माझी पत्नी कुसुम – त्याच्याकडे गेलो. मुंबईहून माझी मुलगी करुणा, जावई प्रशांत व छोटा नातू आरव पण आले होते.
लुधियानाच्या काही गोष्टी मला अधोरेखीत करावसे वाटल्यामुळे मी हा लेख लिहिण्यास प्रवृत झालो.
आपल्या महाराष्ट्रापेक्षा तेथे बरेच बदल मला आढळले. पहिला बदल नमूद करण्यासारखा असा की, तेथील घरांच्या ले-आउट मधील मोकळ्या जागेत ठिकठिकाणी बगीचे बांधलेले आहेत. बगीच्यात फिरण्यासाठी त्याच्या भोवताल सिमेंटचे वाल्किंग-टॅक आहेत. बगीच्यात बसायला व झोपून व्यायाम अथवा योगासन करण्यासाठी विशेष प्रकारचे बाकडे आहेत. मध्ये फुलझाडे व सावलीसाठी इतर झाडे पण आहेत. हिरव्या गवताचे लॉन्स आहेत. मध्ये पाण्याचे कारंजे आहेत. विशेष म्हणजे या बगीच्याची नियमित देखरेख होत असतांना दिसते. पाण्याअभावी झाडे वाळत आहेत व जागोजागी कचरा साचलेला आहे, असे दृश्य दिसत नाही. त्यामुळे या बगीच्यात फिरायला व घटकाभर थांबायला हुरूप येतो. मी रोज सकाळी व संध्याकाळी निरनिराळ्या बगीच्यात फिरायला जात होतो. म्हातारे-कोतारे लोकांसाठी ही तर खासच सोय असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले.
आमच्या अकोल्यात आणि महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी कुठे फिरायला जावे, असाच प्रश्न पडतो. प्रदुर्षित रोडने फिरण्याशिवाय गत्यंतर नसते. कारण येथील प्रत्येक ले-आउट मधील ओपनस्पेस मध्ये देवळाशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. लोकांना भाविक व दैववादी बनण्यासाठी येथे खास व्यवस्था केलेली असते. मात्र त्यांना घटकाभर मोकळ्या हवेत फिरता येईल, व्यायाम-योगासन करता येईल व त्याद्वारे त्यांची शरीरसंपदा तंदुरुस्त राहिल, असा विचार मात्र कोणाच्याही मनात येत नाही.
मी लुधियानात अशा बगीच्यात जेव्हा जेव्हा फिरायला जायचो, तेव्हा तेव्हा लुधियानाच्या लोकांना सतत मनातल्या मनात धन्यवाद देत होतो. महाराष्टातील लोकांनी देवळाऐवजी बगीच्याचा जरूर विचार करावा अशी सुबुद्धी देव त्यांना देवोत असे विचार मला फिरता फिरता माझ्या मनात सारखे यायचे. पण महाराष्ट्रातील देव त्यांना अशी सुबुद्धी देतील याची खात्री मला वाटत नव्हती. कारण तसे जर केले तर हे देव कुठे जातील, असा प्रश्न त्यांना पडेल. मग महाराष्टात त्यांना राहण्याची व त्यांच्या पुजार्यांच्या पोटा-पाण्याची पंचाईत होईल ना…हेही ओघानेच आले. तरीही मी जेव्हा परत गावाला जाईन तेव्हा मला फिरायला ठिकठिकाणी हिरवीगार व फळा-फुलांनी बहरलेले बाग-बगीचे दिसतील, असे स्वप्न मात्र पडत होते.
आणखी एक बदल मला जाणवला तो असा की, येथील बंगल्याच्या म्हणजे तेथील लोकांच्या भाषेत कोठी – त्याच्या आजूबाजूला व पाठीमागे मोकळी जागा सोडलेली दिसत नाही. त्यामुळे त्यांचे घरे चांगले प्रशस्त दिसत होते. घरात पुरेसा प्रकाश व हवा येण्यासाठी त्यांनी खाली मोकळी जागा म्हणजे अंगण व वर बाल्कनी सोडल्याचे दिसले.
आपल्याकडे दोन घराच्या मध्ये व घराच्या मागे मोकळी जागा सोडावी लागते. या मोकळ्या जागेत नाल्या असतात. या नाल्या कचरा-काडीने व घाणीने जबरदस्त भरलेल्या दिसतात. कोणीही त्याची साफसफाई करतांना आढळत नाहीत. उलट त्यात आणखी घाण कशी साचविल्या जाईल याचाच प्रयत्न आजूबाजूचे घरवाले करीत असतांना दिसतात. कारण कुणालाही साफसफाई करण्याचे सोयरसुतक तर नसतेच, शिवाय कुणाला वेळ पण नसतो. फक्त घाण करायला मात्र भरपूर वेळ मिळत असतो, असे म्हटल्याव वावगे होणार नाही. एक मात्र खरे की, या घाणीत डुकरे-कुत्रे यांना फिरायला मात्र चांगली व्यवस्था झालेली असते. मच्छराचा सुळसुळाट त्यामुळेच झालेला असतो, हे काही वाईट नाही. त्यांचा त्रास सहन करायला महाराष्ट्रीयन लोक चांगले सरसावले आहेत.
तसेच आणखी एक गोष्ट मला विशेष जाणवली. ती म्हणजे तेथील गुरुद्वारा ! आपल्या महाराष्ट्रात गल्लोगल्ली, घरोघरी, रस्त्याच्या बाजूने लहानमोठे देवळे आहेत. तेथे मोठमोठे गुरुद्वारा आहेत. पण पाहण्यासारखे आणि स्वच्छ आहेत. आम्ही एका गुरुद्वारात गेलो तेथे धर्मार्थ दवाखान्याची सोय केली होती. तेथे मल्टीस्पेशालिस्ट दवाखाना होता. निरनिराळ्या रोगावर उपचार करणारे डॉक्टर्स होते. त्यांच्या उपचाराचे दर अगदी अल्प होते. अशा प्रकारची व्यवस्था इकडे एकाही देवळात केलेली महाराष्ट्रात तरी कुठेही दिसणार नाही.
काही गोष्टी येथे निश्चितच चांगल्या दिसल्यात. पण एक गोष्ट येथे मात्र खटकली. ती म्हणजे महागाईच्या बाबतीत ! आमच्या घराच्या जवळच दर रविवारी भाजी बाजार भरत असतो. तेथे भाजी बरीच महाग दिसली. एका गिर्हाईकाने माझ्या समोर भेंडीचा भाव विचारला असतांना भाजीवाल्याने १५ रुपये पाव असा भाव सांगितला. तेव्हा त्या गिर्हाईकाने ‘तुम पंजाबवाले सब मिलके लुटो.’ असे म्हणून महाग भाजीबद्दल आपला राग व्यक्त केला होता. मला वाटते तो पण पंजाबच्या बाहेरचा असावा.
आम्ही अमृतसरला सुवर्ण मंदिर असलेलं गुरुद्वारा पहायला गेलो. खरेच शिखांचे हे मंदिर पाहण्यासारखे आहे. मध्ये मंदिर आहे आणि भोवताल पाणी आहे. गुरुद्वाराच्या परिसरात जातांना पाण्यात पाय बुडवून जावे लागते. तसेच डोक्यावर टोपी अथवा फडके बांधून जाण्याची प्रथा आहे. चुकून कोणी डोक्यावरची टोपी अथवा फडके काढू नये म्हणून स्वयंसेवक सरदारजी लक्ष ठेवून असतात. ते अशा लोकांना टोकत असतात.
आम्ही तीन वाजता भारत-पाकिस्तानच्या अट्टारी येथील वाघा बॉर्डरवर गेलो. तेथे कस्टमच्या लोकांनी व्हि.आय.पी. पाहूणे म्हणून आमची बसण्याची विशेष सोय केली होती. तेथे ’रिट्रीट्रिंग सिरोमनी’ होत असते. म्हणजे देशाचा तिरंगा झेंडा उतरविण्याचा कार्यक्रम ! दोन्ही देशाचे बॉर्डर सिक्युरीटी फोर्सचे जवान संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान वाजत गाजत हा कार्यक्रम करीत असतात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी खूप लोक येत असतात.
दोन्हीही बाजूचे दरवाजे उघडले जातात. ’नो मॅन लॅंड’ म्हणजे कोणत्याही देशाची मालकी नसलेली जागा – ह्या ठिकाणी जावून दोन्ही देशाचे जवान एकाच वेळेस सकाळी चढविलेला झेंडा उतरवितात.
दोन्ही देशाचे लोक लॉउडस्पिकरवर जोरजोरात घोषणा देतात. पाकिस्तान कडील ’पाकिस्तान की जय’ म्हणतात तर आपल्याकडील ’हिंदुस्तान की जय’ असे म्हणतात. ’हिंदुस्तान की जय’ असे म्हणण्यापेक्षा ’भारत की जय’ असे म्हणायला त्यांना का लाज वाटते, ते समजत नाही. हिंदुस्तान या शब्दाचा उल्लेख भारताच्या घटनेत कुठेही नसतांना ’हिंदुस्तान या शब्दाचा वापर कां करतात ते कळले नाही. शासकिय स्तरावर तरी अशी चूक होवू नये असे मला वाटते.
परत येतांना आम्ही सुवर्ण मंदिरजवळ असलेल्या जालियानवाला बाग पाहिला. स्वातंत्र्य चळवळीतील हे एक ऎतीहासिक स्थळ आहे. या बागेला भोवताल घरांच्या भिंतीनी वेढलेले असून आत-बाहेर जाण्यासाठी एकच रस्ता होता. येथे १९१९ साली रौलट ऍक्टच्या विरोधात जमलेल्या लोकांवर जनरल डायर यांनी बेछूटपणे गोळीबार केला होता. यात अनेक लोक मारल्या गेले. सैरावैरा पळत असतांना या बागेत असलेल्या विहिरीत १२० लोक एकावर एक पडून मेल्याचा ऊल्लेख आहे. तेथील भिंतीवर बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आहेत.
आम्ही परत जातांना पुन्हा एकदा रात्रीला हे सुवर्ण मंदिर पाहिलं. रात्रीला खरोखरच हे मंदिर आणखी खुलून दिसत होते.
त्यानंतर आम्ही शिमला पाहायला गेलो. शिमल्याचं सृष्टी सौंदर्य खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. या स्थळाची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याने त्याबाबत लिहिण्याचं मी मुद्दामहून टाळत आहे. तथापी तेथे आठवणीत राहाणार्या दोन घटना म्हणजे एक कुफरी आणि दुसरं जखू मंदिर – या बाबत लिहिल्याशिवाय राहवत नाही.
कुफरी हे हिलस्टेशन आहे. रोडपर्यंत आल्यावर आतमध्ये जाण्यासाठी घोड्याशिवाय दुसरं कोणतंही वाहन नाही. हा रस्ता कुठेकुठे अरुंद, दगड-धोंड्यांचा, चढ-उताराचा व चिखलाचा आहे.
घोड्याच्या माध्यमातून तेथील लोकांची कमाई व्हावी म्हणूनच की काय तेथे मुद्दामच रोड बांधल्या जात नाहीत, असे वाटते. या रस्त्याने घोड्यावर बसून जातांना फार भीती वाटते. लहान मुलांना घेऊन जातांना मोठ्या जिकीरीचे काम वाटते. प्रत्येक घोड्यासोबत घोडेवाला असेलच असे नाही. तीन-चार घोड्यांना एकत्र बांधून त्याच्या सोबत एखादा घोडेवाला असतो. प्रत्येक घोड्याला आमच्याकडून ३२० रुपये घेऊन आणखी सांगितले की हा सरकारी रेट आहे.
त्या स्पॉटवर खाण्याचे व खेळण्याचे दुकाने दिसले. तेथे २०० रुपये घेऊन जाग्यावरुनच दुर्बिणीतून दूरचे काही स्थळ दाखविले. ऍपल गार्डन आहे म्हणतात. पण त्यावेळी झाडाला काही ऍपल लागलेले दिसले नाहीत. अरुंद रस्त्याने भीती वाटल्याने आम्ही लव्हर्स गार्डनला न जाता मधातूनच परत आलो. विनाकारण पैसे आणि वेळ खर्च झाला अशी हळहळ वाटत होती. तेथुनच ’थ्रीरी ईडियट’ ची सुटींग झाली होती असे सांगितल्याने आम्ही पटीयाला राजाचा ४३ किलोमिटर दूर असलेला महाल पाहायला गेलो.
दुसरी आठवण म्हणजे जखू मंदिरची ! जखू मंदिर हे शिमल्यातच असून तेथे वर दोन किलोमीटर ऊंचावर जावे लागते. तेथे हनुमानाचे मंदिर आहे. मंदिराचं आकर्षण नव्हतं. पण हे मंदिर सर्वात ऊंच असल्याने आम्ही ते पाहण्यासाठी मुद्दामच गेलो होतो. खरोखरच वरुन शिमल्याचं अप्रतिम असं विहंगम दृष्य दिसते.
हनुमान म्हटले की वानर आलेच ! या ठिकाणी वानराचा फार वावर आहे. आपल्याजवळील सामान ते कधी हिसकाऊन घेतील, ते सांगता येत नाही. त्यामुळे त्यांच्यापासून जपून राहण्यासाठी सोबत काठी व त्यांना खाण्यासाठी चुरमूरे-फुटाने १० रुपयात घेऊन जाण्याचा सल्ला तेथील चणे विक्रेते देत होते.
आम्ही पायर्याने वर चढत नाही तर एका वानराने खरोखरच कुसुमच्या खांद्यावरील ओढणी हिसकावून घेतली होती. मग चणे विकणार्याने चण्याचा पुडा त्या वानराकडे फेकल्यावर ओढणी टाकून दिली. त्या चण्याचे १० रुपये मात्र त्याने आमच्याकडून वसुल करायला विसरला नाही.. पैसे कमाविण्यासाठी वानराचा वापर तर करीत नाहीत ना अशी पुसटशी शंका आमच्या मनात येउन गेल्याशिवाय राहिली नाही. तसेच एका माणसाचा चष्मा सुध्दा वानरांनी हिसकाऊन घेतला होता.
या प्रवासातील अशा काही आठवणी मनात साठवून आम्ही आपापल्या गावला परत आलो.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कामगारांना मार्गदर्शन
25 Novजी. आय. पी. रेल्वेकामगार परिषदमनमाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दि. १२ व १३ फेब्रुवारी १९३८ रोजी दिलेले भाषण कामगार वर्गासाठी अत्यंत मोलाचे, मार्गदर्शक आणि दिशानिर्देश देणारे आहे.
त्यांच्या भाषणातील काही महत्वाचे मुद्दें असे आहेत.
१. कामगाराच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे. यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राष्ट्रीय उद्दिष्टासाठी संघटीत झाले पाहिजे.
२. कामगार संघटनानी राजकारणात शिरलेच पाहिजे. कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हिताचे सरक्षण करणे अशक्य आहे.
३. संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.
४. स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वावर आधारलेली नवी पध्दती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ समाजाची पुनर्रचना आणि अशा प्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करून शकेल? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे.
५. कांग्रेस पासून स्वतंत्र स्वतःचा असा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही.
६. जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल, अशा पक्षामध्ये तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्याविरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष हा होय. स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगाराच्या हिताला सर्वोच्च स्थान देतो, त्याचे धोरण सुनिश्चित आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड १८, भाग २)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच भाषणात म्हणतात की, ‘कम्युनिस्टांपेक्षा कामगारांचा अधिक नाश दुसर्या कोणीही केला नाही. कामगार संघटनेचा मात्र निश्चितच सर्वनाश केला. अशाप्रकारच्या निरर्थक चळवळीपासून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करता येण्यासारखी आहे? आगीचा भडका उडवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वतःच्या घराचीही काळजी न घेणार्या आगलाव्यासारखाच कम्युनिस्ट माणूस सिध्द झालेला आहे.”
तरीही एका आंबेडकरवादी राजकीय चळवळीमध्ये वरच्या पदावर काम करणारा व्यक्ती एका कम्युनिस्ट प्रणीत विज कामगार संघटनामध्ये वरच्या पदावर कसे काय काम करु शकतो, हे अनाकलनीय आहे
पुढार्यांच्या अशा विसंगत वागणुकीला काय म्हणावे? त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांच्या विचाराचे अध्ययन करावे. तरच बाबासाहेबांच्या विचाराची खर्या अर्थाने पेरणी होऊ शकेल.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ९ नोव्हेंबर १९४२ रोजी मुंबई आकाशवाणी केंद्रावर मजूरमंत्री या नात्याने भाषण केले. या भाषणात ते म्हणतात की, “देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकतो? हे नेतृत्व फक्त कामगारवर्गच देऊ शकतो, असे मला वाटते. नवी समाज रचनाच कामगारांचे आशास्थान असते. त्यासाठी कामगाराच योगदान करू शकतात आणि या दिशेनेच भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात.”
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहिणारे लेखक धनंजय कीर, पान क्रमांक ३७७ वर लिहितात की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मद्रास सदर्न मराठा रेल्वे कामगारांनी मानपत्र दिले, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय सत्ता काबिज करणे ही गोष्ट कामगार संघ स्थापन करण्यापेक्षा अधिक महत्वाची आहे असे म्हटले होते.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कारकुनांपेक्षा म्हणजे मोक्याची जागा हस्तगत करणारे अधिकारी वर्ग अधिक पाहिजे होता. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीश कालीन भारताचे गवर्नरजनरल लॉर्ड लिनलिथगो यांना उच्च शिक्षणाकरीता स्कॉलरशिपची मागणी करतांना म्हणाले होते की, “मला राजवाड्याच्या टोकावर बसणारी माणसे हवीत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आपल्या लोकांचे संरक्षण करायचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार?” परंतु अधिकारी वर्गांनी याचे भान ठेवलेले दिसत नाहीत.
महात्मा कबीर आपल्या दोह्यात म्हणतात की,
“बडा हुवा तो क्या हुवा, जैसे पेड खजूर !
पंछी को भी छाया नही, फल लागे अती दूर !!
अधिकारी वर्ग काही अपवाद सोडला तर खजुराच्या झाडासारखे उंचच उंच वाढत गेलेत. परंतु त्यांचा आंबेडकरी चळवळीला व समाजाला काहीच उपयोग झालेला दिसत नाही.
निरनिराळ्या क्षेत्रात विखुरलेल्या आंबेडकरवादी कामगार संघटनांनी या भाषणाचा अभ्यास करून आपल्या कामगारांचे प्रबोधन करणे आवश्यक होते. परंतु हे कार्य होत नसल्याने कामगारवर्ग आंबेडकर चळवळीच्या संदर्भात दिशाहीन झालेले दिसत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दिशानिर्देशानुसार कामगार संघटनांची चळवळ चालत नसल्याचे आपण पाहतो आहे. एवढेच नव्हे तर कुठे कुठे विकृत स्वरूप आलेले दिसते. आंदोलनाच्या वेळी टाकलेल्या मंडपात किवा अधिवेशन स्थळाच्या राहत्या ठिकाणी कामगारवर्ग चळवळीचे पुस्तके वाचण्यापेक्षा जुगाराचे पत्ते कुटत बसल्याचे चित्र बहुधा पाहायला मिळत असते. तसेच अधिवेशन, आंदोलन किवा इतर कोणत्याही कार्यासाठी बाहेर ठिकाणी जायचे असल्यास खाणेपिणे व मौजमजा करण्यात वेळ व पैसा घालवीत असतात.
कामगारवर्ग हा समाजातील दुधावरची साय (क्रिम) असणारा वर्ग आहे. कामगारवर्गाची भूमिका पार पाडण्यापूर्वी तो विद्यार्थी वर्गातून गेलेला असतो.
विद्यार्थांना मार्गदर्शन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “ हमारे लडको को दो बाते अवश्य सिखनी चाहिये! प्रथम बात ये है कि, उन्हे प्रमाणित करना होगा, कि वह शिक्षा, बुध्दी, योग्यता मे दुसरोके मुकाबले किसी तरह से पीछे नहि ! दुसरी बात वाह है कि उनका उद्देश केवल आरामदायक जीवन व्यतिक करना ही नही है, बल्की अपने समाज का नेतृत्व करना भी है । ताकि वह स्वतंत्र हो सके तथा पूर्णतः सम्मानजनक जीवन बीता सके ! शिक्षा ऐसा एक हथियार है जिसके द्वारा वह अपनी तथा अपने समाज की जिंदगी को अच्छा बना सकते है !”
कामगारवर्ग हा बुद्धिजिवी वर्गामध्ये मोडतो. बुद्धिजिवी वर्गाबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर “जातिभेद का उच्छेद” (Annihilation of Caste) या पुस्तकात लिहितात की, “प्रत्येक देशामध्ये बुद्धिजिवी वर्ग प्रभावशाली असतो. जो सल्ला व नेतृत्व देऊ शकतो. देशातील अधिकांश जनता विचारशील व क्रियाशील नसतात. ते बुद्धीजीवी वर्गाचे अनुकरण करून त्या मार्गाने जात असतात. म्हणून त्या देशाचे समाजाचे भविष्य बुद्धिजिवी वर्गावर अवलंबून असते. बुद्धिजिवी वर्ग चांगला किवा वाईट असू शकतात. बुद्धिजिवी वर्ग इमानदार, स्वतंत्र व निष्पक्ष असेल तर समाजाला संकटकाळी मार्ग काढून योग्य मार्गदर्शन करू शकेल. समाजाला सहाय्य करू शकेल. पथभ्रष्ट लोकांना ते चांगल्या मार्गावर आणू शकतात.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे लिखाण कर्मचार्यांसाठी स्फूर्तिदायक आहे. परंतु त्यांनी त्याप्रमाणे आपली योग्यता सिध्द करण्यास अपयशी ठरल्याचे आपणास दिसत आहे. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच तसे संतापजनक उदगार काढल्याचे त्यांचे निजी चिटणीस नानकचंद रत्तू यांनी “बाबासाहेबांच्या आठवणी” “( Reminiscences and remembrances of Dr. B.R.Ambedkar with Babasaheb till the end. Page No. 191- Nanakchand Rattu) या पुस्तकात “शेवटचे दिवसं” या प्रकरणात लिहिले आहे. ते लिहितात की, “मला माझ्या लोकांना शासनकर्ती जमात म्हणून बघायचे आहे. जे समाजातील इतर घटकांसोबत मिळून समानतेने राज्य करतील. मी जे काही अथक प्रयत्न करून मिळविले आहे, त्याचा लाभ आपल्या काही शिकलेल्या लोकांनी उठविला आहे. पण त्यांनी आपल्या बांधवांसाठी सहानुभूती ठेऊन काहीही केलेले नाही. त्याव्दारे त्यांनी आपली नालायकी सिध्द केली. माझे जे काही स्वप्न होते ते त्यांनी धुळीस मिळविले आहे. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी जगत आहेत. त्यांच्यामधून कुणीही समाजासाठी कार्य करायला तयार नाहीत. ते स्वतःच्या नाशाच्या मार्गाने चालले आहेत. मी आता माझे लक्ष खेड्यापाड्यांमध्ये राहणार्या अशिक्षित बहुजन समाजाकडे देणार आहे. जे आजपर्यंत पिडीत आहेत आणि आर्थिकदृष्ट्या न बदलता तसाच आहे.”
बुद्धीवाद्यांच्या संदर्भात एक तत्वचिंतक जॉर्ज ओरवेल (George Orwell) म्हणतात की, “History is continuously re-written by those peoples who control the present.” म्हणजे इतिहासाचे सतत पुनर्लेखन करणारे लोकच वर्तमानकाळाला नियंत्रित करीत असतात. अशी क्षमता ज्या समाजातील बुद्धीवाद्यांमध्ये असते तेच लोक इतिहासाचे पुनर्लेखन करू शकतात. म्हणून हा तत्वचिंतक पुढे म्हणतो की, “ Those who controls present, controls the past. Those who controls past, controls the future” म्हणजेच जो वर्तमान काळाला नियंत्रित करतो, तो गतकाळाला नियंत्रित करतो. जो गतकाळाला नियंत्रित करतो, तो भविष्यकाळाला नियंत्रित करतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे एक बुध्दिवंत झाले की, ज्यांनी हजारो वर्षापासून चालत आलेला अस्पृश्यतेचा प्रवाह रोखून धरला व इतिहासालाच बदलून टाकले. काय अशी किमया करण्याची हिंमत आजचा बुद्धीवंत कामगारवर्ग दाखवू शकेल?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दोन संकल्पना : त्या म्हणजे पहिली शासनकर्ती जमात बनणे व दुसरी प्रबुद्ध भारत बनविणे. म्हणजेच सम्पूर्ण भारत बौद्धमय करणे. हे साकार करण्यासाठी कामगारवर्गांनी बुद्धी, पैसा आणि वेळ देणे आवश्यक आहे.
माननीय कांशीरामजी यांनी २७ जुलै २००१ रोजी नेहरू मेमोरियल हॉल पुणे येथे कर्मचार्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले होते, “कुछ पैसा इकठ्ठा करके समाज को देना या कुछ समाजकी सेवा करना ये तो काम अच्छा है| लेकिन कोई बडा काम नही है| सही काम मै जो समजता हुं वो ये है की, हजारो सालो से गीराये हुये समाज को उसके पैरो पर खडा करना और उसको अपनी मुव्हमेंट का अहसास कराना, उसके बारे मी जानकार बनाना और समाज को अपने पैरो पर खडा करके उसे मुव्हमेंट को चलाने लायक, कामयाब बनाने लायक बनाना, मै समझता हुं की ये काम पढे-लिखे कार्माचारीओको करना चाहिये था|”
प्रसिद्ध दलित साहित्यिक दया पवार म्हणतात की, “प्रखर तेजाने तळपणारा सूर्य केव्हाच अस्तास गेला. ज्या काजव्यांचा आम्ही जयजयकार केला, ते केव्हाच निस्तेज झालेत. आता तुम्हीच प्राकाशाचे पुंजके व्हा आणि क्रांतीचा जयजयकार करा !”
तेव्हा कामगारवर्गानी बाबासाहेबांच्या दिशानिर्दशाला अनुसरून कामगार चळवळ राबविली पाहिजे, अशी अपेक्षा करणे गैर होणार नाही.
मी आणि माझी पत्नी कुसुम, पहिल्यांदा जीवनात परदेश प्रवास केला दिनांक २३.०३.२०१२ ते २७.०३.२०१२ असा ५ दिवसाचा थायलंडचा प्रवास केसरी टूरच्या माध्यमातून केला.
